सातारा : ‘‘बीव्हीजी’च्या कृषी तंत्रज्ञानामुळे विषमुक्त शेतमालाचे दुप्पट उत्पादन मिळते. त्यामुळे आयव्हरी कोस्टमधील शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत,’ असे प्रतिपादन आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टचे कृषी मंत्री गॉसौ टॉरे यांनी केले.
नुकतीच त्यांनी सातारा मेगा फूड पार्क प्रकल्पाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. सातारा मेगा फूड पार्कचे अध्यक्ष विजयकुमार चोले, नाबार्डचे संदीप शर्मा, नायब तहसीलदार दयानंद कोळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
टॉरे म्हणाले, ‘आयव्हरी कोस्टमध्ये विषमुक्त शेतमालाचे उत्पादन वाढवण्याचा आमचा मानस आहे. ‘बीव्हीजी’ने विषमुक्त शेतमाल निर्मितीची चळवळ भारतात सुरू केली आहे. त्याच आधारावर आम्हाला आयव्हरी कोस्टमध्ये विषमुक्त शेतमाल निर्मितीची चळवळ सुरू करायची आहे. मेगा फूड प्रकल्पाद्वारे आयव्हरी कोस्टमध्ये रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे.’
चोले म्हणाले, ‘शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या शेतमालाची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा अधिक नफा मिळत आहे. मेगा फूड पार्कमध्ये तयार होणाऱ्या सर्वच उत्पादनांना देशभरातून मागणी वाढली आहे. ‘बीव्हीजी’ने मेगा फूड पार्कच्या माध्यमातून ग्रामीण भारतात अर्थव्यवस्थेचे रोल मॉडेल तयार केले आहे. याच मॉडेलचा फायदा आयव्हरी कोस्टमधील शेतकऱ्यांना होणार आहे.’